पुतळ्यांच्या देखभालीसाठी मनपा-विद्यापीठात सामंजस्य करार
रासेयोच्या विद्यार्थ्यांचा सहभाग : वर्षभरात ७५० विद्यार्थ्यांना अग्निशमन प्रशिक्षण
Date : 19 Jul 2021
यासंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक सोमवारी (ता. १९) महापौर कक्षात पार पडली. बैठकीला उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, विजय झलके, नगरसेविका संगीता गिऱ्हे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त विजय देशमुख, मिलिंद मेश्राम, रातुम नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, रासेयोचे संचालक डॉ. सोपान देव पिसे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण उपस्थित होत्या.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ६८ पुतळे आणि १४ स्मारके आहेत. या पुतळ्यांची आणि स्मारकांची देखभाल लोकसहभागातून व्हावी, अशी संकल्पना मांडली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी हे करू शकतात, असा प्रस्ताव आपण कुलगुरुंसमोर मांडला. प्रस्तावाला त्यांनी होकार देत विद्यापीठाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली. शहरातील पुतळ्यांच्या परिसरात जी महाविद्यालये आहेत त्यांना पुतळ्यांचे पालकत्व देऊन रासेयोचे विद्यार्थी मनपाच्या अग्निशमन विभाग आणि स्थावर विभागाशी समन्वयन करून पुतळ्यांची निगा राखेल. या मोबदल्यात मनपातर्फे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणाऱ्या सुमारे ७५० विद्यार्थ्यांना मनपाच्या अग्निशमन महाविद्यालयाच्या माध्यमातून अग्निशमन प्रशिक्षण देण्यात येईल. दहा वर्षात असे ७५०० विद्यार्थी तयार होतील. शहरात कुठेही आगीची घटना घडली तर त्या भागातील प्रशिक्षित विद्यार्थी मदतीकरिता धावून जाईल, ही त्यामागची भूमिका असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावरील रासेयोसाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यापीठांतर्गत असलेल्या चार जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातही जर विद्यापीठ असा उपक्रम राबवित असेल तर नागपूर मनपाचा अग्निशमन विभाग तेथील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देईल, असेही महापौरांनी यावेळी सुचविले. पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासाठी शहरातील विविध संस्थांनाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत शहरात जेवढे पुतळे आहे, त्या व्यक्तींची माहिती देणारे पुस्तक विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. शहरातील सौंदर्यात भर घालणाऱ्या अशा उपक्रमासाठी विद्यापीठ सदैव तत्पर आणि तयार असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. प्रारंभी उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी विषद केली. हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी मनपाचे अधिकारी आणि विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील काही दिवसात महाविद्यालयांना जबाबदारींचे वाटप करण्यात येईल आणि हा प्रकल्प सुरू होईल, असेही ते म्हणाले.