देश विभाजनाच्या आठवणींना उजाळा देणारे प्रदर्शन शनिवारी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिनव आयोजन
Date : 12 Aug 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. नागपूर शहरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला जात असून या अनुषंगाने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरातील ७५ चौकांसह रोषणाई, शहिद स्मारक, प्रमुख स्थळे, महत्वाच्या इमारती, मनपा मुख्यालय व झोन कार्यालयांच्या इमारती या सर्वांवर रोषणाई करण्यात आली आहे. नृत्य आणि पथनाट्यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा इतिहास पुढे आणला जात आहे. अशाच अनेक उपक्रमांमध्ये देशाच्या फाळणीचा ज्वलंत इतिहास पुढे आणणा-या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.
१९४७ साली भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली. या फाळणीचा इतिहास, त्यामधील आठवणी, फाळणीतील ऐतिहासिक घडामोडी या सर्वांचा मागोवा या प्रदर्शनीच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. या प्रदर्शनीला नागपुरातील विद्यार्थी, युवा, ज्येष्ठ, महिला या सर्वांनीच आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
प्रोफाईलवर तिरंगा ठेवा
सोशल मीडियाचे सर्व हँडल व्हाट्सॲप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्रामसह अन्य ठिकाणी भारतीय तिरंग्याची फोटो ठेवण्याबाबत राज्य शासनाकडून दिशानिर्देश जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार मनपातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागपूर शहरातील सर्व नागरिकांनी स्वत:च्या सोशल मीडियावर तिरंग्याचे प्रोफाईल फोटो लावण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.