भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनावर अधिक भर द्या
आस्था निवारागृहला भेट देत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले निर्देश
Date : 12 Feb 2024
नागपूर महानगरपालिकाद्वारा संचालित केंद्र शासन पुरस्कृत भिक्षेकरी सर्वसमावेशक पुनर्वसन प्रकल्प आस्था निवारागृहला आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.१२) भेट दिली. याप्रसंगी मनपाच्या समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व्यवस्थापक श्री. विनय त्रिकोलवार, श्री. प्रमोद खोब्रागडे, निवारागृहाचे संचालन करणाऱ्या सह्याद्री संस्थेचे प्रकल्प संचालक श्री. देवेंद्र क्षीरसागर, निवारागृहाचे अधीक्षक श्री. गौतम नागरे, व्यवस्थापक शुभम माकडे, श्री. राकेश घाटे, समुपदेशक मनिषा डंभारे आदी उपस्थित होते.
भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय युवक कल्याण संस्थेच्या सहकार्याने धंतोली झोन अंतर्गत तुलस्यान हाउस, हुंडई शोरूम जवळ, घाट रोड येथे आस्था निवारागृह चालविण्यास येते. १५० भिक्षेकाराची क्षमता असणाऱ्या आस्था निवारागृहत सध्या १२१ भिक्षेकरी वास्तव्यास आहेत. या निवारागृहाला भेट देत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी संपूर्ण निवारागृहाची पाहणी केली. येथे राहत असलेल्या भिक्षेकरूंची त्यांच्या प्रकृति बद्ल चौकशी करीत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच भिक्षेकरूंसाठी असणाऱ्या निवारागृहाचे रेकॉर्ड नियमित तपासावे, ज्याचे पुनर्वसन शक्य आहेत अशांच्या योग्य पुनर्वसनावर अधिक भर द्यावा, आरोग्य व स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग भारत सरकार यांच्या मार्फत भिक्षेकरी मुक्त शहर करण्याबाबत राष्ट्रीय स्तरावरमोहिम राबविण्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर निवडलेल्या देशातील १० महानगरपालिकांपैकी नागपूर महानगरपालिका एक आहे.आस्था निवारागृह येथे भिक्षेकरी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक रोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे, त्यांचे योग्य समुपदेशन केले जात असून, आरोग्यविषयक उपचार, एकूणच अन्न, वस्त्र, औषधोपचार, मेकओव्हर, रोजगाराच्या सुविधा, प्रशिक्षण आदी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागपूर शहर भिक्षेकरीमुक्त शहर व्हावे यासाठी हा प्रकल्प पथदर्शी आहे, ३१ जानेवारी पर्यंत ६२७ भिक्षेकरी लाभार्थ्यांना निवारागृहाचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी ५०६ भिक्षेकरी लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात आले आहे. हे विशेष.