पावसाळापूर्व नालेसफाईचे कामे त्वरित पूर्ण करा
आरोग्य सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांचे निर्देश
Date : 14 May 2026
शहरातील नाले सफाई व घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आढावा बैठक आज (ता. 14) सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती श्री. श्रीकांत आगलावे, सदस्य श्री. विक्रम ग्वालबंशी, श्रीमती पूजा भूगावकर, श्री. योगेश मडावी, श्रीमती रजनी वानखेडे, श्री. प्रमोद ठाकूर, श्रीमती भावना लोणारे यांच्यासह उपायुक्त श्री. राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह प्रत्येक झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.
मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी शहरात सुरू असलेल्या पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाचा आढावा बैठकीत सांगितले. पावसाळापूर्व कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसर्या टप्प्यात उर्वरित कामे पूर्ण केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक झोनच्या स्वच्छता अधिकार्यांनी संबंधित झोनमध्ये असलेल्या नाले सफाईच्या कामाची माहिती दिली. तसेच नालेसफाईसाठी लवकरच राज्य सरकारतर्फे काही मशीन मनपाला मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नालेसफाईची माहिती नगरसेवकांना द्या
पावसाळ्यात शहरातील अनेक भागात पाणी साचत असल्याने अनेकदा काही घरांना धोका निर्माण होतो. त्यामुळे शहरात नाले सफाईच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी केली. ज्या ठिकाणी जेसीबी व इतर मशीनरीची आवश्यकता आहे. नालेसफाईच्या कामाचा झोननिहाय एक निश्चित आराखडा तयार करण्यात यावा, यात प्रत्येक नगरसेवकाला सोबत घेऊन पावसाळापूर्व नालेसफाईचा कार्यक्रम निश्चित करावा, यामुळे नालेसफाईच्या कामात सुसूत्रता येईल व नगरसेवकांना सुद्धा प्रभागात होत असलेल्या कामाची माहिती मिळेल, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त सफाई कामगारांची आवश्यकता असल्याची मागणी यावेळी समितीच्या सदस्यांनी केली. स्वच्छता कर्मचार्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अंतिम टप्प्यात असलेली ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक झोनमध्ये किमान 50 सफाई कर्मचार्यांची अतिरिक्त नियुक्ती केली जाईल, असेही श्रीमती अतकरे यांनी यावेळी सांगितले.
नालेसफाईच्या कामाचे छायाचित्रांसह माहिती प्रभागातील नगरसेवकांना बीव्हीजी व एजी एन्व्हीरो कंपनीद्वारे देण्यात यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. ज्या ठिकाणी नाल्यामध्ये कचरा टाकण्यात येतो. त्याठिकाणी नाल्यावर जाळी लावण्यात यावे, तसेच धोकादायक असलेल्या ठिकाणे निश्चित करून पावसाळ्यात तेथे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करण्यात याव्या, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.