अनधिकृत मोबाईल टॉवरवर कारवाई करा
स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या सभापती अश्विनी जिचकार यांचे निर्देश
Date : 16 Jul 2026
मनपाच्या स्थापत्य व विशेष प्रकल्प समितीची बैठक सभापती श्रीमती अश्विनी जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 16) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती श्री. प्रदीप पोहाणे, नगरसेवक श्री. चंद्रकांत खंगार, नगरसेविका श्रीमती कुमुदिनी गुडधे, नगरसेविका कु. दुर्गेश्वरी कोसेकर, नगरसेवक श्री. महेंद्र धनविजय, नगरसेवक मो. मुजतबा मुस्तफा अंसारी, नगरसेविका श्रीमती विद्या कन्हेरे यांच्यासह नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. ऋतुराज जाधव, सहायक आयुक्त श्री. विजय थूल, सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, सहायक आयुक्त श्री. नरेंद्र बावनकर, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, सहायक आयुक्त श्री. विकास रायबोले, बाजार अधीक्षक श्री. महेंद्र बोबडे उपस्थित होते.
शहरात सध्या मोबाईल कंपन्यांनी 862 मोबाईल टॉवर उभारलेले आहेत. यात 431 मोबाईल टॉवर अनधिकृत असून अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारलेल्या मोबाईल कंपन्यांना झोन कार्यालयाकडून नोटीस पाठविल्या जात असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मोबाईल कंपन्या अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारत असल्याने यावर मनपाच्या नियमात कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे मत उपसभापती श्री. प्रदीप पोहाणे यांनी व्यक्त केले. अनेकदा अनधिकृत जागांवर मोबाईल टॉवर उभारले जातात. शहरातील मोबाईल टॉवरची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांना मोबाईल टॉवरच्या संदर्भात त्यांच्याकडे असलेल्या परवानगीच्या माहिती मनपाच्या कार्यालयात 8 दिवसात जमा करावी, असे निर्देश देण्यात आले. मनपाचे आर्थिक नुकसान होत असल्याने या संदर्भात सर्वसमावेशक एक धोरण आखण्यात यावे, असेही निर्देश यावेळी श्रीमती अश्विनी जिचकार यांनी दिले.
शहरातील बाजारातील दुकानांची संख्या व तेथून वर्षाला किती उत्पन्न होत आहे, यासंदर्भात सभापती श्रीमती अश्विनी जिचकार यांनी माहिती मागितली. महापालिकेचे दुकाने दुसऱ्याना हस्तांतरित होत असून यातून मनपाला आर्थिक लाभ अधिक झाला पाहिजे तसेच बाजार विभागाचे उत्पन्न वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डीपीडीसीच्या अंतर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामाची विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती सादर करावी, असे निर्देश सभापती श्रीमती अश्विनी जिचकार यांनी दिले. डीपीडीसीच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास ती कामे त्वरित करावी, व पाणी साचणार्या जागांमधून पाण्याचा निचरा त्वरित होईल, यासाठी काळजी घ्यावी, असेही निर्देश श्रीमती अश्विनी जिचकार यांनी दिले.